MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Tuesday, March 8, 2011

माणूस आणि चिमणी - ४

माणूस आणि चिमणी - ४


एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती एकदम दिसेनाशी झाली.
भोवती भुर्रर्रर्र नाही, अंगणात चिवचिव नाही, घरटं बांधताना घरभर पडलेल्या काड्या नाहीत. घरटं बांधायला घरात जागाच नाही. आणि भिंतीवर आजी-आजोबा आणि देवांचे फोटोही नाहीत.
आता घरातल्या बाळाला चिऊची गोष्ट सांगताना दाखवायला चिऊच नाही.
ती त्याच्या आयुष्याचा भाग होती आणि त्याच्या अस्तित्वाचा लचका तोडल्यासारखी ती दिसेनाशी झाली.
हे कधीपासून झालं? आणि का?
ती मोकळी आणि स्वतंत्र पाखरं! त्यांना माणसानं हात का लावला?
त्याला खरंच काही माहीत नव्हतं, तो डोळेझाक करत होता का तो सोंग करत होता?
काहीच न कळण्याएवढा तो मूर्ख, मद्दड होता, का काही कळून घ्यायचेच नाही इतका तो बथ्थड आणि हेकट होता? 
का कळूनही कळत नाहीसे दाखवणारा ढोंगी आणि स्वार्थी होता?
एक माणूस होता पण आता एक चिऊ नव्हतीच.

एक माणूस होता. पण एक चिऊ नव्हतीच.
आणि कशी असेल? घराभोवती अंगण नव्हतं, गॅलरीतल्या कुंडीत खुरटे गुलाब होते पण झाडं-झुडुपं नव्हती. घरात वळचणी, अडगळीच्या जागा, तसबीरी नव्हत्या. घरात चिमण्यांना टाकायला दाणेसुद्धा नव्हते. मॉलमधून आणलेली तयार आट्याची किंवा तयार पोळ्यांची पाकिटं होती. आणि मुख्य म्हणजे दाणे टाकायला छोटे हातही नव्हते.
काऊ कसेबसे कुठेतरी, काहीही खाऊन, राहिले होते. पण पोपट, मैना, बुलबुलही कुठे होते? आणि त्यांच्यासाठी झाडं, फळं, फुलंही कुठं होती? आणि लबाड कोल्हा, दुष्ट लांडगा, बाघोबा आणि जंगलचा राजा कुठं होते?

एक माणूस होता. तो आता आजोबा झाला.
नातीला घेऊन, टीव्हीपुढ्च्या खुर्चीवर बसून मॅगी खाताना तो तिला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगे. आधी ती छान ऐकून घेई. मग एकदा तिनं चिऊ म्हणजे काय? चिऊ कुठे? म्हणून विचारलं. मग त्यानं त्या गोष्टी सांगणंच बंद केलं. तिनं विचारला नव्हता, पण तीन पिढ्यांच्या अनेक अपराधांचा जाब तिला देणं त्याला शक्य झालं नाही.
आता तो तिला माऊ-भूभूच्या गोष्टी सांगतो; टायगररमॅन, फाल्कनमॅन, स्पायडरमॅन, फ्रॉगमॅन, व्हेलमॅन, वेअरवुल्फ, वगैरेंची कॉमिक्स वाचून दाखवतो किंवा सुपरमॅन-मंकीमॅन, झोबो-टोबो- रोबोच्या करामतींनी तिला हसवायचा प्रयत्न करतो. काहीच नाही तर कार्टून नेटवर्क आहेच.

एक माणूस होता. पण भयाण, उजाड जगात तो एकटाच होता.
का तो पण नव्हता?

Monday, March 7, 2011

माणूस आणि चिमणी - ३


माणूस आणि चिमणी - ३ 

एक माणूस आणि एक चिऊ.
ती त्याला कॉलेजमधे भेटली. नाचर्‍या डोळ्यांची, उडत्या केसांची, भरारत्या मनाची. सतत भिरभिरणारी, चिवचिवणारी. चिमणा-चिमणीच्या गोष्टीतली चिमणी.
आणि मग तो चिमणा? तिच्या अवतीभोवती भिरभिरणारा? ...त्यांनी मिळून घरटं बांधायचं?
चिमणीलाही तसंच वाटत होतं का?
ते त्याला माहीत नव्हतं. असा त्यानं कधी विचारच केला नव्हता.
त्याला काहीच कळत नव्हतं.

एक तो आणि एक ती.
ती चिऊ आणि तो ... काऊ?
ती बाळाला जपणरी, खाऊ घालणारी, नीटनेटकं ठेवणारी, वाढवणारी, ती सर्वांची (त्याची सुद्धा) काळजी घेणारी, घर सांभाळणारी.      
तो भटकणारा, उंडारणारा, घर शेणाचंही चालणारा. खा-खा खाणारा आणि सगळीकडे घाण करणारा. अवेळी दार ठोठवणारा. स्वतः काही न करता इतरांकडून अपेक्षा ठेवणारा.
त्यांची जोडी का जमली? कोणी जमवली?
पण खूपदा असंच असतं.
हे त्याला माहीत नव्हतं. तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
पण अशी गोष्ट नको असं त्याला वाटे.

एक तो आणि एक ती. तो चिमणा आणि ती चिमणी.
चिमणा म्हणाला, आपण दोघं घर बांधू. चिमणी म्हणाली, का? चिमणा म्हणाला, असंच. मग चिमणी म्हणाली, चालेल.
मग चिमण्यानं एक गवताची काडी आणली, चिमणीनं एक काडी आणली.
चिमणा म्हणाला, किती दमलीस, मी आणतो काड्या. चिमणी म्हणाली, किती दमलास, मी बांधते घरटं. दोघांनी मिळून एक घरटं बांधलं.
मग चिमण्यानं भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन एक दाणा आणला, चिमणीनं भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन एक दाणा आणला. चिमणा भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन पाणी पिऊन आला, चिमणी भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन पाणी पिऊन आली. दोघांनी भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन आणखी एक-एक दाणा आणला. ते म्हणाले, हा आपल्या पिल्लांसाठी.

मग घरट्यात एक चिमणी चिमणी आली. तिला वाढवण्यात, तिच्यासाठी दाणे आणण्यात दिवस पुरेनासा झाला. तिला छोटे पंख फुटल्यावर ती घरभर उडत असे. दिवसभर तिचा अखंड चिवचिवाट चाले. तिच्यामुळे घर भरलेले असे. तिच्यामुळे घर घर असे. तिच्यामुळे सगळ्याला अर्थ असे. असे किती दिवस भरभर उलटले कळलेच नाही.
तिचे पंख मोठे झाले. तिची झेप मोठी झाली. घरटे तिला पुरेनासे झाले. तिला आकाशही पुरेनासे झाले. तिचा चिमणा दिसल्यावर ती त्याच्याबरोबर मोठ्या आकाशात उडून गेली.
ती घरट्यात असतानाही, नंतर उडून जाताना आणि उडून गेल्यावर जीव कासावीस झाला. आनंदानेही आणि काळजीनेही.
आता घरट्यात पुन्हा चिमणा-चिमणी. दिवसभरात कधीतरी तो म्हणे, चिव-चिव आणि त्यावर ती म्हणे चिव. मग कधीतरी ती म्हणे चिव-चिव आणि त्यावर तो म्हणे चिव.
कधीतरी चिमण्या चिमणीचा फोन येई. त्यावर तिचा चिवचिवाट सुरू झाला की वाटे ती पुन्हा घरभर फिरते आहे. घर भरले आहे.
या सगळ्याची आठवण देत चिऊ आपल भोवती भुर्रर्रर्रकन्‌  उडतच होती, चिवचिवतच होती. नेहमीची, ओळखीची, खूप सवयीची, आपल्या जगण्याचा भाग असलेली. 
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
आणि अजूनही त्याला कळत काहीच नव्हतं.

Tuesday, March 1, 2011

माणूस आणि चिमणी - २


  
माणूस आणि "चिऊ" नावाची चिमणी
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
एकदा घरातले फोटो साफसफाईला काढले. चिमणा-चिमणी उडून गेले. फोटोमागचे चिमणा-चिमणीचे घरटे खाली पडले. गवताच्या काड्या उसकटल्या. एक उडता न येणारे पिल्लू खाली पडले.
तो धावत पाणी घेऊन आला. कुणीतरी त्याला थांबवले.
माणसाचा हात लागला तर चिमण्या त्या पिल्लाला आपल्यात घेणार नाहीत. ते मरून जाईल.
हे ऐकून त्याला धक्का बसला. त्या त्याला आपल्यात का घेणार नाहीत?
पिल्लू त्याच्या डोळ्यांदेखत मेले. चिमण्याही त्याला वाचवू शकल्या नाहीत. नुसत्याच त्याच्याभोवती फडफडत, तडफडत राहिल्या. चिवचिवत राहिल्या. ते ऐकवत नव्हते.
एक घर उद्ध्वस्त झाले. ... म्हणजे काय? ... का? कुणामुळे?
तेव्हा त्याला ते माहीत नव्हते.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते.

एक माणूस आणि एक चिऊ. त्याच्या सतत अवतीभोवती उडणारी, सतत चिवचिवणारी. कळायला लागल्यापासून खूप ओळखीची, सवयीची.
ती आणि इतर पाखरे. चिऊ, काऊ, राघू, मैना, बगळा, बुलबुल, ... ती मोकळी स्वतंत्र पाखरे.
त्यांना माणसाचा हात लागलेला चालत नाही. माणसाचा हात लागला की ...
त्याला धक्का बसला.
इतक्या ओळखीत इतका परकेपणा? इतका अविश्वास, इतकी भीती? ... का?
माणसाचा हात इतका वाईट आहे?
तेव्हा त्याला हे माहीत नव्हते.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते.

Monday, February 28, 2011

माणूस आणि चिमणी - १


माणूस आणि चिऊ नावाची चिमणी



एक माणूस होता आणि एक चिमणी होती. तिचं नाव चिऊ. पहिल्यांदा चिऊ त्याला चिऊ-काऊच्या गोष्टीत भेटली.
तेव्हा तो अगदीच छोटं बाळ होता आणि ती जणू त्याची आईच होती.
ती पावसात वाहून न जाणारं मेणाचं घर त्याच्यासाठी बनवणारी, त्याला खाऊ-पिऊ घालणारी, नीटनेटकं टेवणारी, जपणारी, काळजी घेणारी, नेहमी दक्ष, अशी त्याची आई.
पण तेव्हा त्याला ते माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
  
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती त्याला अंगणात भेटली. चिऊ-चिऊऽऽ करणारी, उड्या मारत हिंडणारी, दाणे टिपणारी, भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाणारी, पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ येणारी.
तेव्हा घराला अंगण होतं. अंगणाच्या पायरीवर, आजीच्या मांडीवर बसून, चिऊ-काऊची गोष्ट ऐकत, तो तेव्हा चिऊला दाणे टाकत असे. ते खायला ती जवळ येई. नवीन चालत्या, अडखळत्या पावलांनी तो तिला पकडायला धावला की ती पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई. पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ येई.
ती चिऊ-काऊच्या गोष्टीतून उतरून अंगणात आली आणि खरी झाली.
पण तेव्हा त्याला ते माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.

एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
मग ती दुसर्‍या गोष्टीत जाऊन बसली. आजोबांची आवडती, न संपणारी गोष्ट.
एक धान्याचं कोठार होत. त्यात अनेक माणसं दर वर्षी धान्य आणून टाकत.
कोठाराला एक छोटी खिडकी होती. तिच्यातून एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
एका वेळी फक्त एकच चिमणी आणि दर वेळी फक्त एकच दाणा. तिच्या छोट्या चोचीत मावेल एवढा. तिचं छोटं पोट भरेल एवढा. अशा अनेक चिमण्या.
एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
धान्याचं कोठार रिकामं होईपर्यंत नवीन वर्षाचं धान्य येऊन ते पुन्हा भरून जाई.
त्या गोष्टीत धान्याचं कोठार कधी रिकामं होत नसे आणि गोष्ट कधी संपत नसे.
आणि तोपर्यंत चिमण्यांना आणि माणसांनाही धान्य कधी कमी पडत नसे.
हे खूपच सुरक्षित आणि समाधानकारक होतं. त्यात एक आश्वासन होतं. चिमण्यांच्या उडण्याचा भुर्रर्रर्रर्रर्र आवाज येतो आहे तोपर्यंत कोठार रिकामं असणार नाही आणि कोणाला काही कधी कमी पडणार नाही अशी श्रद्धा त्यात होती.
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.

एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती एक-एक गवताची काडी घेऊन यायची, खिडकीच्या गजावर बसून आत डोकावायची आणि मग घरात शिरायची.
अशी चिमणीची आणि चिमण्याची घरात भुर्रर्रर्रर्रर्र भुर्रर्रर्रर्रर्र चालू असायची.
त्यांनी घरात आजी-आजोबाच्या हार घातलेल्या फोटोंमागं घरटं बांधलं होतं. घरात घर. 
तेव्हा भिंतींवर आजी-आजोबा, पणजी-पणजोबा आणि देव-देवतांचे खूप फोटो असायचे. त्यांच्या फोटोंमागे चिमण्यांच्या घरट्यांतले आणि त्यांच्या फोटोंतून बघणार्‍या प्रेमळ नजरांसमोर घरांतले संसार फुलायचे. घरभर चिमण्यांचा आणि मुलामुलींचा अखंड चिवचिवाट चालू असायचा. 
त्यांतला एक मुलगा म्हणजे तो असायचा. 
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.


Saturday, February 12, 2011

कथा n1 - श्री व सौ पाल

श्री व सौ पाल 
एकदा श्री. पाल आपल्या बायकोला म्हणाला, आपल्यामधे काही संवादच नाही.
चक्‌ चक्‌, सौ. पाल म्हणाली.
बघ ना! माझ्या या म्हणण्यावरही तुझी प्रतिक्रिया फक्त ’चक्‌ चक्‌’.
चक्‌ चक्‌.
पुन्हा ’चक्‌ चक्‌’!
... ...
माझं म्हणणं तुला आवडत नाही का?
... ...
माझं म्हणणं तुला पटत नाही का?
... ...
त्यावर तुला काही म्हणायचंच नाही का?
... ...
 “तुला काही मतंच नाही का?
... ...
 “तुला विचारच करता येत नाही का?
... ...
 “तू मतीमंद आहेस का?
... ...
 “तुला चक्‌ चक्‌ शिवाय काही बोलताच येत नाही का?
... ...
तुला मोबाईल घेऊन देऊ का?
... ...
 “छेः बुवा! मी काय भिंतीपुढे बोलतोय का?
भिंतीवरून बोलतोय्‌स.
काय?
तुला दुरुस्त केलं.
काय? ... चक्‌ चक्‌! ... काही म्हणायचीसुद्धा सोय उरली नाही.
मग म्हणू नकोस. सगळं म्हणायला कशाला हवं.
चक्‌! ... तेही खरंय्‌ म्हणा. म्हणून काही उपयोग असेल तर म्हणायचं.
 “चक्‌ चक्‌.
मग काय तर! ... ... मला काही वेळा वाटतं, संवादासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी आपला शब्द-संग्रह कमी पडतो.
चक्‌ चक्‌. पण त्यामुळे आपली भांडणंही होत नाहीत.
चक्‌ चक्‌. ... पण ती शब्द-संग्रह कमी पडल्यामुळे नाहीत. त्याचं कारण मी या भिंतीवर तर तू त्या भिंतीवर, मी या खोलीत तर तू त्या खोलीत, मी मंगळावर तर तू शुक्रावर. म्हणून!
चक्‌ चक्‌.
तू आनंद व्यक्त करते आहेस का हळहळ?
चक्‌ चक्‌. ... माणसाच्या संगतीत राहून राहून तू हे असले विचार करतोय्‌स. आपण कुठंही असलो तरी मनातलं कळायलाकळवायला शब्दांच्या कुबड्या तुला कधीपासून लागायला लागल्या? दोन शब्दांवरच तर आपला संसार झाला.
चक्‌ चक्‌.
 “सुसंवादासाठी शब्दांची नाही तर कळवण्याची-कळून घेण्याची इच्छा लागते.
चक्‌ चक्‌. ... नेहमीप्रमाणे तुझंच बरोबर.

Monday, January 31, 2011

पं. भीमसेन जोशी


पं. भीमसेन जोशी
आपल्या आयुष्यातील अत्यंतिक आनंदाच्या क्षणांपैकी कित्येक क्षणांवर भीमसेनजींचा हक्क आहे. ते त्यांनी निर्माण केले आहेत. त्या क्षणांची आठवण आपल्याला आहे तोपर्यंत ते आपल्यातच आहेत. ते आपल्या आयुष्याचा भागच आहेत असं मला वाटतं.
या सवाई गंधर्व महोत्सवाला (डिसेंबर १०) मी गेलो असताना पं. शिवकुमारजींच्या संतूर-वादनाआधी ते आले व तो कार्यक्रम होईपर्यंत थांबले. मी त्यांना प्रत्यक्ष पाहू शकलो नाही (फक्त CCTV च्या पडद्यावर पाहिलं). पण तेवढा काळ संपूर्ण परिसराची भारलेली अवस्था मी अनुभवली. खुद्द पं. शिवकुमारजींनीही त्याच भारलेल्या अवस्थेत संतूरवादन केलं असावं असं वाटतं. तो सर्वच एक अविस्मरणीय अनुभव होता.
अगदी लहानपणी मी वडिलांबरोबर भीमसेनजींचा कार्यक्रम शिवाजी मंदिरात (पुण्यात होते) समक्ष पहिल्यांदा ऐकला. तेव्हा त्यांनी गायलेला मारुबिहाग माझ्या अजून कानांत व मनात आहे. त्यातील रसिया हो ऽऽ ना जाऽऽ ... या विलंबित ख्यालापेक्षा तडपतऽ रैनऽ दिनऽ ही द्रुत चीज मनात जास्त ठसली. त्याचं कारण त्या चीजेची ठेवण आणि त्यांची त्यावेळची जोषपूर्ण गायकी. खांदे घुसळून जोरकस तान घेताना खाली वाकून त्यांचं डोकं जमिनीला टेकायला आलं की भूकंप होतोय असं वाटायचं. पियाबिन मोरा जिया तरसे कळण्याइतका मी मोठा नव्हतो पण ते पियाबिन तरसतायत असं वाटण्याऐवजी त्या तडपण्याचा ते पियाला जाब विचाराहेत अशा आवेशात ते गायले हेच लक्षात आहे. त्याची आठवण याच (सवाई गंधर्व महोत्सव) कार्यक्रमात आनंदगंधर्व (श्री. आनंद भाटे) यांनी गायलेल्या मारुबिहागाने इतक्या वर्षांनी पुन्हा करून दिली.
नंतर जरा समजायला लगल्यावर त्यांचा (पुण्यात) भारत गायन समाजात झालेला एक कार्यक्रम ऐकायला मिळाला. त्यावेळी आमच्याकडे भावेबुवा (रामभाऊ भावे) आईला गाणं शिकवायला येत असत. (भावेबुवांबद्दल नंतर कव्हातरी.) तेही सवाई गंधर्वांचे शिष्य. त्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाला जाता आलं. कार्यक्रम संध्याकाळी सहा-सव्वासहाला सुरू झाला. कार्यक्रमाला फक्त ७०-८० लोक असतील. मी सात-आठ फुटांवरून त्यांना ऐकलं व पाहिलं. त्यांची जादू व त्यांच्या गाण्याची खरी ओळख तेव्हा पहिल्यांदा झाली. पूरिया-धनाश्री आणि पाऽऽऽर कर अर्ज सुनो ही खर्ज नीवर सम असलेली झपतालातली चीज आणि पायलिया झंकार ऽऽ ही द्रुत त्रितालातील चीज यांचीही पहिली ओळख हीच. त्या विशिष्ट वेळी ही ओळख भीमसेनजींनी करून दिली हे माझं भाग्य. चंद्रकांत कामतांनाही तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं. (नंतर भीमसेनजींचं गाणं म्हणजे तबल्याला चंद्रकांत कामत हे समीकरणच होतं.)
याच सुमाराला एका कार्यक्रमात मी त्यांची जो भजे हरीको सदा, वोही परमपद पाएगा ही भैरवी ऐकली. सगळ्यांनाच ती नवीन होती. भीमसेनजींनीही बहुधा ती पहिल्यांदाच गायली होती. तोपर्यंत भैरवी म्हणजे भैरवी ठुमरी असा समज असावा. या भक्तीगीताने त्यांनी तो कायमचा पुसून टाकला. हळूहळू त्यांनी आम्हाला सुरांच्या ओंजळीत हलकेच अलगद उचलून परमपदाशी आणून सोडलं. तो एक अविस्मरणीय आनंदानुभव होता. ही भैरवी मी नंतर अनेकदा ऐकली.
नंतर सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचं गाणं असंख्य वेळा ऐकलं. एक-दोन वेळा मुद्दाम मध्यरात्री बसून मालकंस, दरबारी गायले होते पण बहुधा शेवटी सकाळी बसत. (सकाळची नंतर-नंतर दुपार होत असे.) त्यामुळे ललत, रामकली, कोमल-रिषभ आसावरी आणि तोडीचे प्रकार. तोडी तर चार-पाच वेळा ऐकला. प्रत्येक वेळी वेगळा. पहाटे पाचला भक्ती, आळवणी आणि शांतीनं ओथंबलेला तोडी. तो संपतासंपता जणू परमेश्वराच्या कृपाप्रसादामुळे उजळलेल्या दिशा आणि दुपारी बाराला कडाक्याच्या थंडीत उन्हाच्या उबेबरोबरच चटकाही बसावा त्याप्रमाणे भक्तीबरोबर विरक्ती आणि आध्यात्मिक अनुभूतीची नशा (किंवा समाधी अवस्था?).
अभंगवाणीच्या अगदी सुरुवातीचा काही कार्यक्रमांपैकी एक केसरीवाड्यात (बहुधा गणपती-उत्सवाच्या काळात) झाला होता. तुडुंब गर्दीत एका कडेला पण त्याच्यापासून बारा-पंधरा फुटांवरून, उभं राहून मी तो ऐकला. त्यांच्या शास्त्रीय गायनापेक्षा तो वेगळाच अनुभव होता.
८ वर्षांपूर्वी (डिसेंबर २००२ साली) सुवर्णमहोत्सवी सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचं गायन मी अगदी समोर बसून ऐकलं ते (मी प्रत्यक्ष ऐकलेलं) शेवटचं. त्यावेळी ते दिसायला थकलेले, कृश, कोणाचा तरी हात धरून सावकाश मंचावर आले व पाय खाली सोडून बसले. कसंतरीच वाटलं. पण त्यांनी गायला सुरुवात केली ती नेहमीच्या आवाजात. पण आताचं गाणं अथांग, गंभीर, दैवी. त्यात आक्रमकता, अभिनिवेश काही नाही. ते स्वयंभू, स्वयंसिद्ध, सिद्ध, तपस्वी. संगीताचे अनभिषिक्त सम्राट! ते सागरासारखे आणि आपण त्यात निर्भयपणे डुंबतोय कारण त्यांच्या स्वरलाटांवर त्यांनी आपल्याला अलगद उचलून धरलेलं. गाणं खूप गहन पण त्यांनी आपल्यापुढे सोपं करून, उलगडून दाखवलेलं. शिवाय हातांच्या हालचालींनी समजावूनही दिलेलं. त्यांच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं फळ त्यांनी आपल्याला आपली लायकी नसताना दान केलेलं.
(याच कार्यक्रमात मी विलायतखॉंसाहेबांचं सतारवादन ऐकलं तेही शेवटचं. कारण त्यानंतर १३ मार्च २००४ रोजी ते गेले.)
यांतील बहुतेक सगळे अत्यंत अमूल्य कार्यक्रम मी फुकट ऐकले व पाहिले.
त्यांचं गाणं पाहणंही तितकंच महत्त्वाचं. त्यावेळी काही लोक गातानाच्या त्यांच्या हातवार्‍यांना नावे ठेवत. आत्ता त्यांनी आकाशातून दोन स्वर आणले, आता इकडून स्वर आणून तिकडे फेकले, आत्ता फुले खुडत असताना एकदम श्रोत्यांची कापाकापी चालू केली, वगैरे. पण त्या काळात त्यांच्या हातवार्‍यांमुळे मला गाणं जितकं समजलं तितकं इतर कशामुळेही नाही.
रेकॉर्ड्‌स तर किती आणि किती वेळा ऐकल्या याची गणतीच नाही. रामकली, कोमल-रिषभ आसावरी, ललत, तोडी, मुलतानी, यमन, पूरिया, पूरिया-कल्याण, मारवा, दुर्गा, शुद्ध-कल्याण, छायानट, अभोगी, दरबारी, मियॉं-मल्हार, सूरमल्हार, इ. रेकॉर्ड्‌स मधल्या जागान्‌जागा पाठ आहेत. मनात केव्हाही असमाधान, खळबळ असेल तर त्यांची (कुठलीही) रेकॉर्ड लावावी व मन स्वच्छ, शांत करावं. 
व्यवहारी जगात लडबडणार्‍या आपल्यासारख्या असमाधानी, अशांत, कोरड्या, अश्रद्ध जीवांना प्रेम-शृंगाराबरोबरच शांती, समाधान, भक्ती, समर्पण आणि विरक्ती यांसारख्या अनुभूतींपर्यंत भीमसेनजींनी (आणि त्यांच्यासारख्याच अनेक गायक, वादक, चित्रकार, शिल्पकार, नर्तक, लेखक यांनी) पोचवलं आणि माणूसपणाच्या जवळ आणलं.
आणि यांच्यापर्यंत आम्हाला आमच्या आई-वडिलांनी आणि काही शिक्षकांनी पोचवलं. यांच्यापर्यंत म्हणजे भीमसेनजी, अमीरखॉंसाहेब, कुमारजी, जसराजजी, मल्लिकार्जुन, पन्नालाल घोष, अली अकबर खॉंसाहेब, पं. रविशंकर, विलायतखॉंसाहेब, पं. शिवकुमार आणि पु. ल., जी. ए., कुसुमाग्रज, ग्रेस, खानोलकर आणि उदयशंकर, बिरजूमहाराज आणि मायकेल एंजेलो, मूर, दिलवाडा मंदिरं, वेरूळ, ताजमहाल, अजिंठा आणि राजा रविवर्मा, हेब्बर, बेन्द्रे, सडवेलकर, गॉग, पिकासो, आणि ... ...
संस्कार म्हणजे शेवटी चांगलं काय ते समजणं आणि त्याच्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करत राहाणं. आणि माणूसपणाच्या जवळ जाणं.
हे सर्व लोक आमच्यात, आमच्याबरोबर आहेत म्हणून आम्ही आहोत.
हे सर्व आमच्या आयुष्यातून काढलं तर मग आमच्यात काय उरलं?

Thursday, November 11, 2010

आपल्याला बुवा राजकारणातलं काही समजत नाही

  काल महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. पण आज सर्व चॅनल्सवर "बम्बई" आणि "भुजबळ नाराज आहेत का?" (का नाराज आहेत याचं कुणालाच काही नाही) याचीच चर्चा सुरू आहे. आणि अजितदादा दिल्लील गेले आहेत. आणि आरारांचं काय?
बाकी काहीही असो, राजसाहेबांचं "मुख्यमंत्र्यांनी ’मुम्बई’ नावाचा जप केला पाहिजे" हे आवडलं.