MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Wednesday, April 29, 2020

गोष्ट मानवाची


गोष्ट मानवाची
सौ. सुलभा प्रभुणे

कोणे एके काळची कथा. एक सुंदर ग्रह होता. पृथ्वी नावाचा. निसर्गराजा तिथे राज्य करत होता. राज्यात प्राणी होते, पक्षी होते, झाडे-वेली नद्या-नाले, समुद्र देखील होते. सगळे कसे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. एकमेकांना मदत करत होते.
पण हल्ली निसर्गराजा कसल्यातरी चिंतेत सतत वावरत असे. शेवटी सृष्टी राणीने त्याला त्याचे कारण विचारले.
“माझी प्रजा सतत कंटाळलेली, दमलेली, आजारी दिसत आहे.” निसर्गराजा म्हणाला. “कोणीही कामचुकार नाही. सगळे जीव तोडून काम करत आहेत. पण कोणीच नीट काम करू शकत नाही. सगळेजणच भीतीच्या छायेत वावरत आहेत असं वाटतं.”
“कोणी असूर त्रास देत आहे का?सृष्टी राणीने विचारले.
“कोणताही असूर नाही, शत्रू नाही ... पण हल्ली माझ्या सगळ्याच प्रजाजनांकडून खूप तक्रारीही येऊ लागल्या आहेत.तो म्हणाला.
कसल्या तक्रारी महाराज?
“कोणालाही नीट काम करता येत नाही हीच तक्रार.” तो म्हणाला. खरं तर हे मला गेले कित्येक दिवस जाणवतं आहे. पण मला हस्तक्षेप करावा लागणार नाही असं मला वाटत होतं.
“पण हे सगळं का होत आहे हेही तुम्ही शोधलं असेलच ना?
“हो महाराणी. हा त्रास का होतोय आणि कोणामुळे होतोय हेही मला ठाऊक आहे.”
“मग कशाला एव्हढी चिंता? ज्याच्यामुळं त्रास होतोय त्याला समज द्या, शिक्षा करा म्हणजे झालं.”
 “ तोच तर माझ्यापुढचा प्रश्न आहे. ह्या सगळ्याला मानवच जबाबदार आहे असं आता मला स्पष्ट दिसू लागलं आहे. तो सगळ्याच प्रांतांत ढवळाढवळ करतो आहे. त्यामुळं सगळं संतुलनच बिघडत चाललं आहे. मुख्य म्हणजे, कोणावरच अन्याय न होता सर्वांना पोटभर मिळावं आणि सगळं विश्वच सुरळीत चालावं म्हणून आपण दोघांनी दिवसरात्र खपून जी अन्नसाखळी निर्माण केली होती, तीच तो उध्वस्त करत चालला आहे.  तो जणू आपणच निर्माता असल्यासारखा अनेक गोष्टी निर्माण करू लागला आहे. त्यालाही काहीच हरकत नाही. कारण खुद्द निर्मात्यांनीच त्याला ती ताकद दिली आहे. पण आपण काय निर्माण करतो आहोत हे त्याला कळत नाही, असं मला वाटू लागलंय. आणि या सगळ्या गोष्टींची माझ्या इतर प्रजेला तर अजिबात सवय नाही. त्यांना शांततेची आणि फक्त लहान आवाजांची सवय होती. पण आता हा मानव काय भयंकर मोठे आवाज करतो. त्याचे ते कारखाने, मोठमोठी यंत्रे, सुरुंग आणि फटाके ह्या सगळ्या आवाजांनी प्रजा अगदी भेदरून गेली आहे. शिवाय त्यांच्या त्या बेसुमार वाढणार्‍या वाहनांमुळे होणारा प्रचंड धूर आणि आवाज ह्याचं मी काय करू? त्याच्या घरांसाठी, कारखान्यांसाठी, रेल्वे, विमानतळ  यासाठी लागणार्‍या जमिनीसाठी तो माझ्या प्राण्यांची हक्काची जंगलं, झाडं, सगळंच; माझ्या इतर प्रजेची घरंच नष्ट करतोय. शिवाय त्यांची आपापसातील भांडणं, युद्धं आणि त्यांसाठी वापरली जाणारी आधुनिक शस्त्रास्त्रं! आता काय करावं हेच मला कळत नाही.”
“मग तुम्ही त्याला शिक्षा का करत नाही?”
“ ती निर्मात्यांची निर्मिती आहे. शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही. मी राजा आहे. प्रजेचं भलं करणं, सांभाळणं हे माझं काम आहे. माझी सर्व ताकद वापरून मी  जंगलतोड, डोंगर पेटवणं यांवर पांघरूण घालण्यासाठी पाऊस पाडून गवताचं आच्छादन घालत राहिलो, नवीन झाडं वाढवत राहिलो. नद्यांचं पाणी शुद्ध करून देत राहिलो. धुरानं भरलेली हवा वारा-पावसानं, झाडांनी सोडलेल्या ऑक्सिजननं शुद्ध करत राहिलो. पण ह्या सगळ्याचा अतिरेक झालाय. क्षमेची पांघरुणं घालण्याच्या माझ्या क्षमतेचीही मर्यादा आता ओलांडली गेली आहे.” 
  “मग तुम्ही त्याच्याविरुध्द निर्मात्यांकडे तक्रार का करत नाही?”
  “त्याचीच तर मला भीती वाटते आहे. कारण मानव म्हणजे निर्मात्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. त्यांना त्याचा खूप अभिमान आहे. अर्थात तो सार्थही आहे. त्यांच्याइतकाच मलाही मानवाचा खूप अभिमान आहे. निर्मात्यांनी त्याच्या निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न मी पाहिले आहेत. बुद्धी वापरून मानव माझे कष्ट कमी करेल, सर्वांना सुखी करण्याच्या कामात मला मदत करेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं आता त्याच्या विरुध्द केलेली तक्रार कदाचित त्यांना आवडणार नाही..”
मग आता काय करणार? 
जे मी आत्तापर्यंत टाळत होतो तेच करावं लागणार असं दिसतं आहे. उद्या सकाळी मी निर्मात्यांकडं जाणार. खरं तर मी इथला राजा असल्यानं सर्व जबाबदारी माझी आहे. इथला कोणताही प्रश्न मीच सोडवला पाहिजे. पण रोज नद्यांची, झाडांची, प्राणी-पक्ष्यांची तब्येत जास्तजास्तच खालावत चालली आहे.  त्यांच्या किंकाळ्यांनी मला कित्येक रात्री झोप नाही. त्यामुळे आता निर्मात्यांकडे जाण्याशिवाय मला कोणताच उपाय दिसत नाही.
सकाळी लवकर उठून निसर्गराजा निर्मात्याकडे गेला. निर्माता आपल्या कार्यशाळेत नेहमीप्रमाणे नवनिर्मीतीच्या कार्यात गढून गेलेला होता. त्याचे ते गढून जाऊन काम करणे निसर्गराजाला नेहमीच भुरळ पाडत असे. कोणत्याही प्रकारे शांतताभंग होऊन त्याची समाधी भंग पावू नये म्हणून निसर्गराजा शांतपणे कोपर्‍यात उभा राहिला. पण निर्मात्याने त्याच्याकडे लगेच वळून पाहिले. त्याचे नेहमीचे अतिशय मोहक हसू त्याच्या चेहर्‍यावर होते.
मला क्षमा करा. मी तुमच्या कामात व्यत्यय आणला. खरंतर मी तुमच्याकडं अतिशय नाईलाजानं आलो आहे.निसर्गराजा म्हणाला.
बस! अरे बस! तू का आला आहेस हे मला पूर्णपणे माहीत आहे. मी तुझी केव्हापासूनच वाट पहात होतो. पण तू खरंच अत्यंत कर्तव्यदक्ष राजा आहेस. त्यामुळं प्रजेच्या दुःखावर उपाय शोधण्याचा तू किती आटोकाट प्रयत्न करत होतास हे मी पाहातच होतो. त्यामुळे तू स्वतःला अजिबातच अपराधी वाटून घेऊ नकोस.
प्रभो, हे काय भयंकर संकट आलं आहे माझ्या प्रजेवर? काय बोलावं तेच मला कळत नाही महाराज.  मानव आपली सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे. आपण त्याला अनेक अद्वितीय देणग्या दिलेल्या आहेत. त्यामुळं तो असं करणार नाही; किंवा त्याच्या हातून नकळत काही चुका झाल्याच तर तो इतर प्रजाजनांप्रमाणं त्यातून नक्की शिकेल, अधिक शहाणा होऊन त्याचा तो त्या दुरुस्त करेल असं मला मनोमन वाटत होतं.  पण आता माझ्या सहनशक्तीच्या पुढे गेल्यानं मला तुमच्याकडे यावं लागलं.”  निसर्गाचा आवाज एकदम कंप पावू लागला. त्याला पुढे बोलवेना.
शांत हो. निसर्गा, चूक माझीच आहे. तेव्हा उपायही मलाच करावा लागणार.
म्हणजे? मी नाही समजलो महाराज. चूक? आणि तीही आपल्याकडून? केवळ अशक्य!
आहे खरं तसं. जेव्हा मी संपूर्ण जगाची निर्मीती करत होतो तेव्हा प्राणी, पशू, पक्षी, झाडे, नद्या-नाले, समुद्र, सगळ्याच गोष्टी मला अगदी माझ्या मनाप्रमाणे निर्दोष तयार करता आल्या. पण जेव्हा मानवाची निर्मिती सुरु होती तेव्हा कसा कोण जाणे पण ह्या मानवात हावकिंवा लोभीपणानावाचा व्हायरस कधी शिरला ते मला देखील कळलंच नाही. तो काढण्याचे मी खूप आटोकाट प्रयत्न केले. पण दुर्दैवानं तो कधीच काढता आला नाही. आता त्या व्हायरसने जगभर थैमान घालणं सुरु केलं आहे. तो मानव त्याच्या प्रभावाखाली बेछूट वृक्षतोड करायला लागला, प्राण्यांची इतकंच काय माणसांचीही हत्या करायला लागला. आपला प्रदेश पुरेना, म्हणून इतरांचा प्रदेश खायला त्यानं सुरुवात केली. त्यासाठी  नाना युक्त्या तो वापरत आहे, संहारक युध्दं करत आहे.  हे सगळं त्या हावव्हायरसचा परिणाम. हा दिवस कधी ना कधी उगवणारच ह्याची मला खात्री होतीच. म्हणून तर मी कित्येक वर्षे त्यावर संशोधन करत होतो. तुझे सगळे प्रयत्न निष्फळ होणारच होते. पण ही परीस्थिती सुधारण्यासाठी तू तुझ्या परीनं प्रयत्न केलेस. म्हणून मला तुझं खूप कौतूक करायचं आहे.
हो महाराज! ते माझे कर्तव्यच आहे. पण तुम्ही मगाशी कसल्या संशोधनाचा उल्लेख केलात. या समस्येवर काही उपाय तुम्हाला सापडला आहे का? लवकर सांगा! मी ऐकायला अगदी उत्सुक आहे.
हो निसर्गा, आता मीच निर्माण केलेलं एक कोरोनानामक व्हायरसचं ब्रह्मास्त्र मी मानवावर सोडणार आहे.
त्यानं काय होईल महाराज?
’हाव’ या व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी या दुसर्‍या ’मुकुटधारी’ व्हायरसचे अस्त्र.”
“त्यामुळे सगळं जग परत पूर्ववत होईल ना? का सगळी मानवजातच नष्ट होईल?
नाही तसं काहीच होणार नाही . पण करोनास्त्रामुळं संपूर्ण मानवजात पुढील काही महिने स्वतःला घरात कोंडून घेईल. त्यामुळं त्याची तुझ्या कामातली ढवळाढवळ कमी होईल. त्यात तुला बिघडलेल्या गोष्टी सुधारायला अवधी मिळेल. तुझे प्रजाजन खूप दमले आहेत. त्यांना थोड्या अंशी विश्रांती मिळेल. काही दिवस तरी ते शांतता अनुभवतील. काही दिवस तरी शुध्द मोकळी हवा अनुभवतील.  काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते परत जोमानं कामाला लागू शकतील. आणि बुद्धी वापरायला, विचार करायला आणि तोल सावरायला मानवालाही वेळ मिळेल.”
अहो, पण महाराज, त्यामुळे संपूर्ण जगात उलथापालथ नाही का होणार? आर्थिक घडीच विस्कटेल. प्रगतीला खीळ बसेल.”
हो! तुझं बरोबरच आहे. पण या काळात प्रगती म्हणजे नक्की काय, आपण कशाच्या मागं धावतोय याचा तो पुनर्विचार करू शकेल. गंभीर आजारावर कडू औषध अपरिहार्यच आहे त्याला काय करणार?
पण महाराज ह्याने तो हावनावाचा व्हायरस पूर्णपणे नष्ट होईल ना?
छे! छे! तो तसा कधीच नष्ट होणार नाही. तो जगाच्या अंतापर्यंत तसाच रहाणार.
अरे बापरे! मग काय हो करणार ? का हे असंच थोड्या थोड्या दिवसांनी ब्रह्मास्त्र सोडायचं? नका हो अशी क्रूर चेष्टा करू. ह्यावर दुसरा काही उपाय नाही का? मला सांगा, मी काय वाट्टेल ते करायला तयार आहे.
राजा इतका निराश होऊ नकोस. मानवाच्या निर्मितीच्या वेळी जसा हावव्हायरस शिरला तशाच मी त्याच वेळी त्याला इतरांना नाही दिल्या अशा अद्भूत शक्तीही दिल्या आहेत. त्या म्हणजे बुद्धिमत्ता, स्वतः विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि अनुभवातून शिकून आपल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे. म्हणूनच मानव ही सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. पण सध्या ’हावे’पुढे बुद्धिमत्तेचा त्याला जरा विसर पडला आहे.
“पण धीर धर. तो यातून बाहेर पडेल तेव्हा अधिक शहाणा होऊन बाहेर पडेल अशी आपण दोघेही आशा करूया. तो सगळ्या गोष्टींचा गांभिर्यानं विचार करेल, आपलं नेमकं काय काय चुकलं हे तो शोधेल आणि स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधेल असं मला वाटतं. तशी माझी खात्रीच आहे!
 “ त्यामुळं आपण दोघेही थोडी वाट पाहूया.  ... खरंतर हे सगळं करायला आणखी पण एक कारण आहे.”
    “ कोणतं महाराज?”
    “ तो या लोभीपणमुळं तुझ्यापासूनही खूप दूर गेला आहे. त्यामुळं त्याला संयम, सुख, समाधान, शांती, सहकार्य या सगळ्याच महत्वाच्या गोष्टींचा विसर पडला आहे. भोवतालचे सर्व सुखात असतील तरच आपण सुखात राहू शकतो हेही तो विसरला आहे. पण मला खात्री आहे, तो ह्यातून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तुझ्या सान्निध्यात आला तर तो नक्कीच तुझ्यासारख क्षमाशील, संयमी आणि उदार होईल आणि मग खूप प्रश्न सहजच सुटतील.”
“आणि असं नाही झालं तर काय?”
“तर काय, पुन्हा एकदा वेगळं ब्रह्मास्त्र वापरायचं. आपण तरी काय करणार? तो पर्यंत आपण दोघेही त्याची ’हाव’ कमी होवो आणि त्याला बुद्धी वापरून विचार करण्याची ताकद येवो’ अशी प्रार्थना करुया.
चालेल देवा, मी मनापासून प्रार्थना करेन. तोपर्यंत माझी सगळी प्रजा सुखरूप राहू दे, असा आशीर्वाद तेव्हढा द्या.
तथास्तु !निर्माता प्रसन्न मुद्रेने म्हणाला.

---      ---      ---      ---      ---

No comments:

Post a Comment